बेमुदत साखळी उपोषणाचा ३६ वा दिवस; शासन-प्रशासन मात्र उदासीन एससी आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी २८ जुलै रोजी जाफ्राबाद येथे महा जनआक्रोश मोर्चा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.24
अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) रद्द करण्यात यावे,या प्रमुख मागणीसाठी जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाने आज ३६ व्या दिवसात प्रवेश केला आहे. सलग ३६ दिवस संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाची शासन व प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय अनुसूचित जातींच्या घटनात्मक आरक्षणाच्या मूळ तत्त्वालाच बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, या एकमुखी मागणीसाठी समाजबांधव गेल्या ३६ दिवसांपासून अहोरात्र आंदोलनात सहभागी होत आहेत. दररोज जाफ्राबाद तालुक्यातील विविध गावांमधून ३५ ते ५० महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिक उपोषणस्थळी उपस्थित राहून आपल्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी सहभाग नोंदवत आहेत. आरदखेडा, बोरगाव, वरखेडा, देळेगव्हाण, खामखेडा, गाडेगव्हाण, हिवरा काबली, कुंभारझरी, देऊळझरी, काळेगाव, सोनखेडा, जवखेडा, डावरगाव, निमखेडा (कोरडे), मंगरूळ, तपोवन, हिवरा बळी, मठ बोरगाव/बोरी, कोल्हापूर, गोधनखेडा, निमखेडा बु., आंबेडकर नगर (जाफ्राबाद), चिंचखेडा, चापनेर, नळविहीरा, येवता, पिंपळगाव-वरूड, आसई, भोरखेडा, वरूड बु., म्हसरूळ, माहोरा, पासोडी, घाणखेडा, रमाई नगर (जाफ्राबाद), कोळेगाव, आंबेडकर, सिंधी बुटखेडा, सांजोळ आदी गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असून आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक लोकसमर्थन मिळत आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन पूर्णपणे शांततामय, शिस्तबद्ध आणि संविधानिक मार्गाने सुरू असूनही शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, न्यायासाठीचा संघर्ष अधिक व्यापक करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी विविध सामाजिक, धार्मिक व आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सातत्याने भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहेत. संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी समाज शेवटपर्यंत संघर्ष करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जाफ्राबाद येथे एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य “महाजन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार असल्याची घोषणा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील हजारो समाजबांधव सहभागी होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. आंदोलनकर्त्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला असून, उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मूळ तत्त्वांच्या संरक्षणासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील, असा निर्धार आंदोलनस्थळी पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.




