मुलींसाठी मानव विकास ची बस सेवा……. मग मुलांसाठी का नाही : ग्रामीण भागातील अनेक मुलांना पायपीट करून गाठावी लागते शाळा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
टेंभुर्णी- ग्रामीण भागातील सर्व मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासन अनेक उपक्रम राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील काही वर्षापासून ग्रामीण भागातून हायस्कूलला शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींसाठी मानव विकास मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अनेक मुलींचा शिक्षणाचा प्रश्न मिटला आहे. मात्र याच मुलींसोबत गावातून शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांसाठी ही बस सेवा उपलब्ध नसल्याने अनेक मुलांना आजही शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. दरम्यान मुलीप्रमाणे मुलांसाठीही मानव विकास बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील पालकातून होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने जवळच्या मोठ्या गावात शिक्षणासाठी दररोज ये जा करीत असतात. यात मुलींच्या संख्ये एवढीच संख्या मुलांची आहे. मात्र मुलांना ही विशेष बस सेवा नसल्याने त्यांना शिक्षणासाठी आजही पायपीट करावी लागत आहे. अनेक गावात बस येत नसल्याने बससाठी असलेल्या जवळच्या फाट्यावर जाण्यासाठीही या मुलांना ३ ते ५ किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागते. याशिवाय वेळेवर बस मिळाली नाही तर अनेकांना शाळेत जाण्यास उशीर होतो तर काहींची त्या दिवशीची शाळा ही बुडते. यासाठी मुलींप्रमाणे मुलांसाठीही मानव विकास अंतर्गत विशेष बस सेवा सुरू करणे नितांत गरजेचे आहे. चौकट- मुलींसाठी आमच्या गावातून मानव विकास व सेवा उपलब्ध असल्याने त्यांचा शाळेत येण्या जाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र आम्हा मुलांसाठी ही बस सेवा नसल्याने आम्हाला आमच्या गावापासून तीन किलोमीटर पर्यंत पायी प्रवास करून बस फाट्यावर बसची वाट पाहत उभे राहावे लागते. यातच सध्या पावसाळा असल्याने अनेकदा पावसात भिजत जावे लागते. बस वेळेवर न आल्यास शाळेस उशीर होतो. अनेकदा बस लवकर निघून गेली तर त्या दिवशीची शाळाही बुडते. आम्हा मुलांसाठीही थेट आमच्या गावातून बस सेवा उपलब्ध करावी. भावेश शिंदे, विद्यार्थी,(इयत्ता 9 वी ),सावरगाव म्हस्के चौकट- शासनाने मुलींसाठी मोफत बस सेवा उपलब्ध केली. त्याचप्रमाणे मुलांसाठी पास चे भाडे घेऊन का होत नाही ही बस सेवा थेट गावातून सुरू करावी. अनेक मुलांना शिक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस याचा त्रास सहन करीत 3 ते 5 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते. याशिवाय मुलींसाठी बस सेवा देणे व मुलांसाठी न देणे यातून स्त्री पुरुष समानता या तत्त्वाची पायमल्ली ही होत आहे. तेव्हा मुलींप्रमाणे मुलांसाठीही मानव विकास बस सेवा प्रत्येक गावातून सुरू करण्यात यावी. भारती गोफणे, सरपंच, भातोडी. फोटो – गावापासून तीन किलोमीटरची पायपीट करून शनिवारी सावरगाव म्हस्के फाट्यावर सकाळच्या शाळेसाठी नियमित बसची वाट पाहत बसलेली ही मुले.




