तिसऱ्या मुंबईच्या विविध त्रुटीचे चौकशीचे आदेश
अखेर प्रस्तावित नवनगर प्रकल्पातील गैरकारभाराची चौकशी करण्याचे शासनाचे आदेश. सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश. न्याय न मिळाल्यास रमाकांत पाटील दाखल करणार जनहित याचिका.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12
पनवेल उरण पेण तालुक्यात एमएमआरडीए मार्फत प्रस्तावित नवनगर प्रकल्पातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन, पुनर्वसनातील त्रुटी,शासकीय कारभार,शेतकऱ्यांचे होणारे विस्थापन व फसवणूक तसेच जैवविविधतेचा होणारा ऱ्हास याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्याकडे ३ मे २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूसंपादन रायगड यांनी कार्यकारी अभियंता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना सदर प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तक्रारदाराने नमूद केलेल्या मुद्द्यांची सखोल चौकशी करून तसेच तातडीने नियमोचित कार्यवाही करण्याबाबत लेखी पत्र द्वारे आदेशित केले आहे सदर आदेशात उक्त चौकशीत विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण विभाग यांना सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. आपल्या तक्रारीची गंभीर दखल शासनाने घेतली असून प्रस्तावित प्रकल्पामधून होणारे शेतकऱ्यांचा नुकसान तसेच पर्यावरण जैवविविधता यांचे नुकसान या बाबत योग्य सुधारणा न झाल्यास व शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास न्याय मिळवण्यासाठी मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी घोषित केले आहे.——————————————————————————
प्रस्तावित तिसऱ्या मुंबई विरोधात पनवेल उरण पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.तिसऱ्या मुंबईला विरोध म्हणून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे (पाटील )यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील चिरनेर येथे शेतकऱ्यांची सभा झाली होती. या सभेत शेतकऱ्यांनी तिसऱ्या मुंबईला तीव्रपणे विरोध केला होता.शेतकऱ्यांना, स्थानिक भूमीपुत्रांना विश्वासात न घेता, त्यांच्या कोणत्याही मागण्यांची दखल न घेता शासन तिसरी मुंबई प्रकल्प जबरदस्तीने शेतकऱ्यांवर लादत आहे. शासनाचे एकतर्फी व मनमानी कारभार सुरु असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.



