सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त

जालना/प्रतिनिधी,दि.3
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत दि. 2 जुलै, 2026 रोजी मौजे धावडा ता.भोकरदन जि.जालना येथे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर दिवटे, पुरवठा निरीक्षण अधिकारी सदानंद नाईक (भोकरदन) , नंदकुमार क्षिरसागर सहाय्यक महसूल अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जालना, राहुल पल्हाटे पुरवठा निरीक्षक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जालना तसेच सहायक पोलीस निरीक्षक (API) संतोष माने (पारध पोलीस ठाणे) यांच्या संयुक्त पथकाने भोकरदन तालुक्यातील विविध ठिकाणी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी करून कारवाई केली. या कारवाई दरम्यान सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू, तांदूळ, हरभरा, मका, ज्वारी, तूर, सोयाबीन आदी धान्याचा विनापरवाना साठा विविध ठिकाणी आढळून आला. पथकाने एकूण 250.66 क्विंटल धान्य जप्त केले. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी धान्य साठवणूक, खरेदी-विक्री व वाहतुकी संदर्भातील आवश्यक कागदपत्रे, साठा नोंदवही, विक्री नोंदी व इतर अभिलेख उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. जप्त धान्याबाबत पंचनामे करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध जीवनाश्यक वस्तू अधिनियम, सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश तसेच इतर लागू कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा अवैध साठा, काळाबाजार किंवा इतर गैरप्रकारांची माहिती मिळाल्यास ती त्वरित पुरवठा विभाग अथवा पोलीस प्रशासनास द्यावी. अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध जिल्हा प्रशासअअनाची कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.



