0
4
8
0
9
5
जालना/प्रतिनिधी,दि.6
शहरातील महानगरपालिका हद्दीत असलेल्या सोरटीनगर, मयुरी पार्क, कृष्णबन सोसायटी या परिसराला जोडणार्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून, भर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी निवेदने देवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना-छत्रपती संभाजीनगर हा मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, महानगरपालिका प्रशासन, या भागातील नगरसेवक यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शहराच्या मध्यवस्तीत तसेच रत्नप्रभा मोटर्सच्या बाजुला असलेल्या मयुरी पार्क, कृष्णबन सोसायटी व सोरटी नगर या कॉलनीमध्ये जाण्यासाठी येथील रहिवाशांना मागील अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने वेळोवेळी महानगरपालिका तसेच या परिसरातील नगरसेवक यांना निवेदन दिले. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना भेटून विनंत्या केल्या. तरी देखील रस्ता निर्मितीसाठी कोणीही लक्ष दिले नाही. भर पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना शाळकरी मुलांना मोठमोठ्या खड्ड्यामधून कसरत करीत घर गाठावे लागत आहे. यापरिसरातील अनेक नागरिक विविध कंपन्या तसेच नवीन एमआयडीसीमध्ये नोकरी करत असल्याने त्यांना रात्री-बेरात्री या रस्त्यावरुन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठे हाल होत आहेत. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना-छत्रपती संभाजीनगर हा मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकार्यांनी तोंडी तर येथील नगरसेवकांनी महापालिकेच्या बैठकीत मुद्या लावून धरून लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रतिक्रिया ः
आम्ही या परिसरात आल्यानंतर नगर परिषदेची महानगर पालिका झाली. त्याचबरोबर शहराच्या अनेक भागात नळ, पाणी, लाईटची व्यवस्था झाली परंतु आम्ही राहत असलेल्या परिसरात महानगरपालिकेने ना रस्ता दिला ना पाणी दिले. त्यामुळे आम्ही शहरात राहतो की एखाद्या खेड्यात असा प्रश्न आम्हाला पडला आहे. महानगरपालिकेने रस्त्याचा प्रश्न न सोडविल्यास लवकरच परिसरातील सर्व नागरिकांना घेऊन महानगरपालिकेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
-अमोल वायाळ, रहिवाशी मयुरी पार्क
आमचा संपूर्ण परिसरातील नागरिकांकडून महानगरपालिका कर आकारणी करते मात्र येथील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी रस्ता देखील उपलब्ध करुन देवू शकत नाही. शहराच्या 10 किमी अंतरावर असलेल्या विविध कॉलन्यामध्ये रस्त्याबरोबर पाण्याची सोय केलेली आहे. मात्र आमच्या परिसरात रस्ता नाही, पाणी नाही आणि विजेची देखील अत्यंत वाईट अवस्था आहे. महापालिकेने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु.
– कैलास धुमाळ, रहिवाशी मयुरी पार्क
पावसाळ्याचे दिवस असल्याने शाळकरी मुलांना शाळेत सोडणे, आणणे या रस्त्यावरुन अत्यंत जिकरीचे होत आहे. खड्डेमय रस्त्यावर चिखल झाल्याने महिला दुचाकीवरुन पडण्याचे प्रमाणही अधिक झाले आहे. रस्ता, वीज, पाणी या बाबीतरी महानगरपालिकेने पुरविणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस लोकांचा उद्रेक वाढत आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील काळात महिलांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या दालनात बसणार आहे.
अॅड. अंकिता बाहेती, कृष्णबन सोसायटी
——————————————————————-
आंदोलनाची दखल…
आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी जेसीबीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्ता तात्पुरता वाहतुकीयोग्य करण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
4
8
0
9
5

