डॉ.आंबेडकरांनी पत्रकारितेतून चळवळींना बळकट केले – प्रो.डॉ.विजय पाटील

जाफराबाद/दत्ता देशमुख, दि.8
येथील सिद्धार्थ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के होते तर प्रमुख वक्ते प्रो.डॉ.विजय पाटील, उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते प्रो.डॉ.विजय पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावर आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भूमिकेतून पत्रकारितेकडे वळले. अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ प्रभावी असे एखादे साधन असावे याची तीव्र जाणीव डॉ.आंबेडकरांना झाली म्हणूनच मूक समाजच्या, वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी ते पत्रकारितेकडे वळले ,३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक पाक्षिकाचा जन्म झाला व त्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घनाघाती चळवळींना बळ मिळाले.३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू झाले. वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वतः लिहित असत २४नोव्हेंबर १९३०रोजी जनता वृत्तपत्राचा प्रथम अंक प्रकाशित झाला.गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल ही या वृत्तपत्राची बिरुदावली होती.४ फेब्रुवारी १९५६ रोजी जनता वृत्तपत्राचे नामकरण होऊन प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.या वृत्तपत्रांमधून बाबासाहेबांनी मंदिर प्रवेश,चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन,रोटी व्यवहार व बेटी व्यवहार,सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद अशा विविध विषयांवर प्रभावी लेखन केले. त्यामुळे समाज जागृत झाला असल्याचे डॉ.पाटील म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या विविध वृत्तपत्राचा आढावा घेतला व तसेच डॉ.आंबेडकरांचे लिखाण वृत्तपत्रात छापून आल्यानंतर ते गाव पातळीपर्यंत वाचून दाखवण्याचे काम शिक्षित वर्ग करत होता आणि ते अशिक्षित वर्गापर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले,त्यामुळेच आंदोलनाला व चळवळीला खेड्यापाड्यातील लोकांचे बळ मिळत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सरिता मणियार यांनी केले तर आभार प्रा.सुरेश पांडे यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




