विनाअनुदानित शाळांना कायमस्वरूपी अपात्र ठरविण्याचा निर्णय मागे घ्यावा!
मराठवाडा शिक्षक संघाची मागणी!
जालना/प्रतिनिधी, दि.8
पंधरा ते पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या विनाअनुदानित शाळांना अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरविण्याचा निर्णय या शाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय करणारा आणि आपले अर्धे आयुष्य या शाळांमधे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा असल्याने तो मागे घ्या आणि या शाळांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार अनुदान देण्यात यावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील ३८२ विनाअनुदानित शाळांना अनुदानापासून कायमस्वरूपी अपात्र ठरविण्याचा शासनादेश २ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा शासनादेश बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कांची पायमल्ली करणारा आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी झटलेल्या फुले-शाहू-आंबेडकर या महामानवाच्या व त्यांची ती परंपरा पुढे नेणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख,कर्मवीर मामासाहेब जगदाळे, समाजसुधारक कर्मवी बलभीमराव कदम या शिक्षण महर्षींच्या विचारांना हरताळ फासणारा आहे.
पंधरा ते पंचेवीस वर्षांपासून या शाळा सुरू आहेत. राज्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील या शाळा आहेत. या शाळांमुळे या भागातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली. या मुलांना हजारो शिक्षक एवढ्या प्रदीर्घ काळापासून विनावेतन ज्ञानदानाचे कार्य करित आहेत. शिक्षक व शिक्षण विरोधी शासनादेशाने हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होणार आहे तद्वतच अनुदानाकडे डोळे लावून बसलेल्या शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जगण्याची उमेद संपणार आहे. या शासनादेशाने हजारो विद्यार्थी, शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांमधे प्रचंड असंतोष, नाराजी व चिड निर्माण झालेली आहे. याची उचित दखल घेऊन शिक्षक व शिक्षण विरोधी सदरील शासनादेश मागे घ्यावा आणि प्रचलित अनुदान सुत्रानुसार या शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे अशी मागणी शिक्षक संघाचे *मार्गदर्शक* पी.एस.घाडगे, व्ही.जी.पवार, अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, गुट्टे एस.जी.*कोषाध्यक्ष* औताडे ए.बी.,सहसचिव पवार टी.जी.,माळी एन.जी.,श्रीमती रेखा साळुंखे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव, अशोक मस्कले, मधुकर जोंधळे, रातोळे जी.जी.,कुरेशी ए.ए.,राठोड पी.आर.,सुर्यवंशी आर.एन.,कदम व्ही.जी.,कौशल्य जी.पी.,पाटोदेकर ए.डी.,सोळंके एन.टी.,वऱ्हाड बी.ए.,तिर्थकर एस.एस.,जमादार एफ.बी.,पाटील पी.एस.यांच्यासह जिल्हाध्यक्ष कालीदास धपाटे, व्यंकटराव चिलवरवार, बसवेश्वर माने,शेरखाने जे.एस.,रमेश आंधळे, यशवंत मकरंद, हरिभाऊ भडके, हाळदे के.एम. जिल्हासचिव गणेश आजबे, रविंद्र वाकोडे, भाई चंद्रकांत चव्हाण, माने जी.व्ही.,विक्रम मायाचारी,संजय यळवंते, कदम एन.टी.,ढेंगळे व्ही.एस.,दिनेश पाटील, बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक डी.जी.तांदळे यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे.




