रायगड विक्रीला काढलाय का ? उरणमधील जमीन व्यवहारांवर राजाराम पाटील यांचा आरोप
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
उरण मध्ये अशोक खरात जमीन प्रकरण मुळे एकच खळबळ उडाली आहे.उरण मध्ये अनेक जमिनी परप्रांतीय नागरिकांना विकले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र काही जमिनीची विक्री ही संशयास्पद आहेत. त्यामुळे उरणच्या जमिनीचा व्यवहार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.उरण तालुक्यातील चाणजे येथील संशयास्पद जमीन व्यवहारामुळे महसूल यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भोंदूगिरी प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांच्या नावावर लाखोंची जमीन खरेदी व तातडीने फेरफार मंजूर झाल्याने संताप व्यक्त होत असून, शेतकरी नेते राजाराम पाटील यांनी “रायगड विक्रीला काढलाय का?” असा थेट सवाल करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. उरण तालुक्यातील चाणजे येथील जमीन व्यवहाराने सध्या संपूर्ण उरण तालुक्यात खळबळ उडवली आहे. भोंदूगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या पत्नी कल्पना खरात हिच्या नावावर सुमारे ५८ लाख ५० हजार रुपयांची जमीन खरेदी झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात फेरफार नोंद मंजूर करण्यात आली. १२ मार्च २०२६ रोजी सर्वे क्रमांक ३७१/३(क्षेत्र ०.२०.०० आर) ही जमीन खरेदी करण्यात आली, तर १३ एप्रिल रोजी फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर झाला. संबंधित महिला फरार असल्याची माहिती असतानाही एवढ्या वेगाने प्रक्रिया पूर्ण झाल्याने तहसील कार्यालयाच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे.या कारभारावर संपूर्ण उरण तालुक्यातील नागरिकांनी टिकेची झोड उडवत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून, सामान्य नागरिकांच्या कामांना विलंब लावणारी यंत्रणा या व्यवहारात इतकी तत्पर कशी झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नायब तहसीलदारांनी “फेरफार नोंद पुढील कार्यवाहीअभावी रद्द करण्यात आली” असे सांगितले असले, तरी ती सुरुवातीला मंजूर कशी झाली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.यामुळे या व्यवहारामागे मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रायगड जिल्हा विक्रीला काढला आहे का असा सवाल उपस्थित केला आहे.
———————————————————————
गुपचूप उरण मध्ये भोंदू बाबा येतात, जमीन खरेदी करतात आणि महसूल विभाग त्यांना सहकार्य करतो. हीच परिस्थिती राहिली, तर रायगड कधी विकला जाईल, हे जनतेलाही कळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक नियम केले होते, पण आज त्यांच्या नावाचा वापर करणारे सत्ताधारीच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यास मूकसंमती देत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांची मालमत्ता तपासावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या तलाठ्यांची तात्काळ बदली केली पाहिजे. जमीन खरेदी विक्री कारभार पारदर्शक झाले पाहिजे – राजाराम पाटील, शेतकरी नेते



