पाऊस लांबल्याने टेंभुर्णी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त,मशागतीचा खर्च पाण्यात जाण्याची भीती

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी कृषी मंडळ आणि परिसरात जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाने दडी मारल्याने खरीप पेरण्या ठप्प झाल्या आहेत. ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखा कडक उन्हाचा तडाखा कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाऊस लांबल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि दागिने गहाण ठेवून शेतीची मशागत वेळेत पूर्ण केली. ठिबक सिंचनाच्या भरवशावर कपाशीची लागवड करणारे शेतकरीही चिंताग्रस्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल कमी वापरण्याबाबत काढलेला आदेश मशागतीच्या वेळी शेतकऱ्यांच्या मुळावर पडल्याचे बोलले जात आहे. ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांना काळ्या बाजारातून जादा पैसे मोजून डिझेल खरेदी करावे लागले. निसर्गान पाठ फिरवल्याने हा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती आहे. टेंभुर्णी, दहेगाव कुंभारझरी अकोला गाडेगव्हाण, तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर कपाशीची लागवड आणि सोयाबीनची धूळपेरणी केली होती. मात्र, पाऊस न आल्याने जमिनीत असलेले महागडे बियाणे कडक उन्हामुळे मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढावू शकते. सकाळपासूनच उन्हाच्या झळा लागत असल्याने विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली असून जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करू लागला आहे. चौकट :- अनेक हवामान अंदाज तज्ञांनी थोड्या कमी प्रमाणात पाऊस पडेल असे सांगितले होते परंतु शेती ही निसर्गाच्या भरोशावर चालते या अंदाजाने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे ते पीक वाया जाण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. असे संतोष आवटी यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याआधी त्यांना धीर दिला पाहिजे आणि योग्य वेळी पेरणी केली असे मार्गदर्शन केले पाहिजे.



