पुनर्वशीत जाफराबाद साठी बस थांबा आहे, पाटी आहे, एस टी महामंडळाची बस थांबतच नाही बस थांबेल ही अपेक्षा नागरिकांची मागणी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
भोकरदन रोडवरील पुनर्वसन जाफ्राबाद परिसरातील बसथांब्यावर अनेक एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बसथांबा असूनही नागरिकांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. पुनर्वसन परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती असून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी बसथांबा उभारण्यात आला असला तरी बहुतांश बस येथे न थांबता पुढे जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांना याचा अधिक फटका बसत आहे. बसथांब्याचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा असताना, बस न थांबल्यामुळे या सुविधेचा लाभ मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने या सम स्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुनर्वसन बसथांब्यावर संबंधित बस नियमित थांबतील यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बसथांब्याचे अस्तित्व केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात प्रवाशांच्या उपयोगी पडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.



