जालना महानगरपालिका शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक शिक्षण सभापती सौ. भाग्यश्री सुजितकुमार जोगस यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीस मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षणाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे व विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक वर्गात किमान २० विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य राहील, अन्यथा संबंधित वर्ग बंद करण्याचा इशारा सभापती जोगस यांनी दिला. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल शाळा संकल्पना, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, अत्याधुनिक शिक्षण साधनांचा वापर यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करावी, तसेच महापालिका शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत शिक्षण व विविध सुविधांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश देण्यात आले. शिक्षकांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या असून यासाठी मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी सभागृह नेते महेशराव निकम, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षण समितीच्या सदस्या कार्तिकी इंगळे, ज्योती सले, स्नेहलता कामड, मंगल गरदस, सहआयुक्त केशव कानपुडे, शिक्षणाधिकारी फैजल सर यांच्यासह सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. एकूणच, या बैठकीत महापालिकेच्या शाळांना अधिक सक्षम, आधुनिक व गुणवत्तापूर्ण बनवण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आले.