मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आला
• संविधान हत्या दिवस-2025 कार्यक्रम • जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीतील चित्रांचे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार
जालना/प्रतिनिधी,दि.25
देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आणीबाणीत लढा दिलेल्या जालना जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. मानधन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे नियोजन केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मानधनासंदर्भात काही अडचणी असल्यास त्या संबंधित कक्षात नोंदविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी केले.
आणीबाणीला 50 वर्षे पुर्ण भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय..! संविधान हत्या दिवस-2025 या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह आणिबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींची उपस्थिती होती.
1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत जालना जिल्ह्यातील 56 व्यक्तींनी सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी कारावास भोगला होता. या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. जिल्ह्यातील 56 व्यक्तींपैकी उपस्थित व्यक्तींचा सन्मान या जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आला. तसेच प्रत्येक संबंधित तालुक्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
1975 ते 1977 काळात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मुल्याच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थिबतीत निडरपणे उभे राहिलात. आपण हुकुमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून, कारावास स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला. देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील आपल्या योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत. हे सन्मान पत्र आपल्या त्याग, धैर्य आणि दृढतेला सलाम करण्यासाठी आहे. आपण आपल्या कृतीतून विचारांतून आणि त्यागातून नव्या पिढीसमोर लोकशाही मुल्यांचा आदर्श ठेवला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान पत्रात नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोरील सभागृहात आणीबाणी कालावधीतील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रदर्शन एक महिनाभर सर्वांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले राहणार आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



