राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न ग्राहकांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहक संरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना/प्रतिनिधी,दि.27
ग्राहक संरक्षण कायदा हा सर्व ठिकाणी लागू होत असून तो सर्व नागरिकांशी निगडीत आहे. जागो ग्राहक जागो असे घोषवाक्य आपण बरेचदा पाहत असतो त्याचे कारण की, ग्राहक आपल्या अधिकाराप्रती अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीची माहिती सामान्य ग्राहकांना होण्यासाठी ग्राहक संरक्षण चळवळीतील सदस्यांनी सर्वदूर पर्यंत कायद्याची जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातील ग्राहकांनी आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच ग्राहक संरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
चर्चासत्रास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्षा अपर्णा काटे, अपर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, तहसीलदार छाया पवार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही.व्ही. महिंद्रकर, अॅड. महेश एस. धनावत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲङ डी.ए.शेंडगे, ग्राहक पंचायतीचे मोहन इंगळे, संजय देशपांडे यांच्यासह इतर सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, आपण ग्राहक म्हणून असतो, अशा सर्व ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा लागू होत असतो. तसेच यामध्ये एखादे प्रकरण दाखल केले असता त्याचा निर्णयही कमी वेळेत उपलब्ध होत असतो. मी स्वत: विद्यार्थी दशेत वैद्यकिय शिक्षण घेत असतांना ऑनलाईन तक्रार दाखल करुन माझे 10 हजार रुपये वापस मिळविले असल्याचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्षा अपर्णा काटे म्हणाल्या की, सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण विविध प्रकारच्या वस्तुची खरेदी करत असतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. ग्राहक संरक्षण कायदा काळानुरुप बदलण्यात आलेला आहे. यामध्ये आता ई-ट्रेडींग, ई-कॉमर्स या बाबींचा समावेश करण्यात आला असून त्यात ऑनलाईन वस्तु खरेदीबाबत विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अधिकार मिळत असतांना काही कर्तव्येही पार पाडावी लागत असतात. त्यामुळे ग्राहकांनी जागृत होवून सजगपणे खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ग्राहक संरक्षण कायद्याविषयक माहिती देत यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने केंद्र शासनाने ग्राहक आयोगातील तक्रारी प्रभावीपणे निकाली काढणे या संकल्पनेवर आधारीत शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे चर्चासत्र आयोजित केले असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सांगितले. चर्चासत्राची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलननाने करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र अध्यक्ष मोहन इंगळे व सचिव संजय देशपांडे यांनी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीचे कार्याबाबत माहिती दिली. तसेच अॅड. महेश धनावत यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे व जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे अॅड. डी.ए. शेडगे यांनी गुन्हेगारी कायदा व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हा ग्राहक परिषदचे अशासकीय सदस्य विजय जाधव, सतिश पंच, नंदकुमार देशपांडे, नंदकुमार देशपांडे, अहेमद नुर शेख मोहम्मद शरीफ, दिलीप वसंतराव लाड, बाबासाहेब सोनटक्के, अनंत वाघमारे, व इतर अशासकीय सदस्य तसेच ग्राहक, रास्तभाव दुकानदार व त्यांचे पदाधिकारी, शेतकरी, गॅस एजन्सी धारक यांची उपस्थिती होती. वजन मापे वैधमापन शास्त्र विभागाचे अधिकरी यांनी वजन काट्याबाबत स्टॉल उभारुन ग्राहक जनजागृती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केले तर सुत्रसंचालन लेखाधिकारी संतोष गोरे यांनी केले. आभार प्रदर्शन तहसिलदार छाया पवार यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन पुरवठा विभागातील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी वैभव महिंद्रकर, राजेश चव्हाण, नंदकुमार क्षीरसागर, गोंविद पेरके, उद्धव जाधव, श्रीमती सविता पेरके, श्रीमती अनुराधा रन्हेर, श्रीमती माधवी पेरके, मयुरी गोफणे व दत्ता काळे यांनी परिश्रम घेतले.