केंद्रीय पथकाने घेतला दुष्काळ परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.14
केंद्रीय आंतर मंत्रालयीन समितीच्या पथकाने आज जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
बैठकीस पथकाचे सदस्य केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए.एल. वाघमारे व मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरिष हुंबर्जे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, पशुसंवर्धन उपायुक्त श्री. कांबळे, आदीसह तहसिलदार, कृषी, सहकार, पाणीपुरवठा, जिल्हा अग्रणी बँक, वीज वितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी सदस्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हयात एकूण पडलेला पाऊस, खरीपाची पेरणी, पिकविमा, विविध प्रकल्पातील पाणीसाठा, टँकरव्दारे होणारा पाणीपुरवठा, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, पाणीपुरवठ्याच्या कार्यान्वित योजना, मनरेगा अंतर्गत रोजागाराची स्थिती, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना यासह दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना याबाबत सदस्यांनी आढावा घेतला.